मुंबई : राज्यात संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या योजनेत तांड्यांमध्ये प्राथमिक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान १ हजार इतकी लोकसंख्या आणि २ गावांतील अंतर ३ किलोमीटर असणे आवश्यक आहे. यातील ही दोन गावांतील तीन किलोमीटर अंतराची अट शिथील करण्यात येईल. या योजनेसाठी पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून, ही समिती बंजारा, लमाण तांडा घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्यांना महसुली गाव घोषित करणे तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करणे या अनुषंगाने कार्यवाही करेल.