कल्याण (सतिष एस राठोड) : “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली.
ही आढावा बैठक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त मा. श्री. अभिनव गोयल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत कार्यक्रमाचे सर्वंकष नियोजन, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य सेवा, तसेच भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त मा. श्री. गोयल यांनी दिले. नागरिकांनीही कार्यक्रमादरम्यान शिस्त व सहकार्य राखावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.

