‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे- कृषिमंत्री

 

‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

अकोला : महाबीज हे शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे आहे. ४७ व्या वर्धापन दिनी हा विश्वास अधिक दृढ व्हावा व तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा, अशा शब्दात राज्याचे कृषीमंत्री, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांनी महाबीजला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा अर्थात महाबीजचा वर्धापन दिन आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख,  व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री, संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजीत सपकाळ तसेच महाबीजचे सभासद व बियाणे उत्पादक शेतकरी, अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात श्री. सत्तार म्हणाले की, बियाणे बाजारात शेतकऱ्यांना हमखास खात्रीचे बियाणे उपलब्ध व्हावे या हेतूने महाबीजची वाटचाल सुरु आहे. गेल्या ४७ वर्षात महाबीजने हा विश्वास अधिक बळकट केला आहे. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सक्षम करण्यात महाबीजचा मोलाचा वाटा आहे. बियाणे क्षेत्रातील तंत्र हे सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, अशी सुचनाही त्यांनी केली. महाबीज वरील शेतकऱ्यांचा विश्वास दृढ होतानाच महाबीजचीही भरभराट व्हावी, कारण शेतकऱ्यांची सेवा करणारे हे केंद्र आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात गुणवंत बिजोत्पादक शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.  तसेच महाबीजचे त्रैमासिक ‘ महाबीज वार्ता’च्या डिजीटल आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. त्यान्म्टर महाबीजचे उत्पादने असणाऱ्या जैविक खत महाजैविक चे लोकार्पण करण्यात आले.  तसेच महाबीजच्या नवीन संकेतस्थळाचेही लोकार्पण कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post